वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य : भाग २

आर्थिक सुख मिळाल्यानंतर आरोग्यचं सुखही अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे पैसा कितीही असूद्या पण जर त्याचा उपभोग घेण्यासाठी उत्तम आरोग्य नसेल तर सर्वकाही निष्फळ आहे. जीवन हसत हसत जगून समाधानाने मृत्यू येणे हीच सुखी आयुष्याची व्याख्या आहे. यामध्ये संपन्न व दोषमुक्त वास्तु सर्वात महत्वाची भूमिका निभावते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. वास्तूचा सर्वाधिक परिणाम होत असेल तर तो म्हणजे त्या वास्तूत सतत निवास करणार्‍या मानवी शरीर व मनावर. विविध दिशेने येणार्‍या सकारात्मक-नकारात्मक वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण हे वास्तूत राहणार्‍या शरीर-मनावर परिणाम करतात आणि त्यातूनच शारीरिक व मानसिक आरोग्याची जडणघडण होत असते.

काही घरांमध्ये सतत आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात. एक झालं की दुसरं दुखणं सुरूच असतं. दुर्दैवाने अकाली मृत्यूही होतात. घरात सतत वाद-विवाद होत असतात. मानसिक अस्वास्थ्य जाणवत असतं. असं होऊनही माणसं वर्षानुवर्षे ते निमूटपणे सहन करतात. पण त्यावर सोपे उपाय अवलंबून आहेत. त्यात खूप खर्च
करणे अथवा जागेची तोडफोड करणे अशी आवश्यकता नाही. आपल्या वास्तूत छोटे-मोठे बदल करून आणि काही सुचनांचं अवलंबण केलं तर या सर्व जाचातून सुटका मिळू शकते.

आपण आरोग्य आणि वास्तूच्या बांधणीत काय संबंध असू शकतो याची उदाहरणे पाहुयात. जसं घराच्या ईशान्य कोपर्‍यात बेडरूम असेल तर ती विविध रोगांना आमंत्रण देणारी ठरते. खासकरून घरातील कर्ता पुरुष जर त्या खोलीत झोपत असेल तर केवळ आरोग्यच नाही तर त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतात. नैऋत्य दिशेला जर काही अडगळ ठेवली तर पृथ्वी तत्व स्थिर राहतं, आग्नेय कोपर्‍यात स्वयंपाकघर असेल तर त्यात अग्नि तत्व स्थिर राहतं. अशी प्रत्येक दिशेची तत्व आहेत ज्यानुसार घराची रचना केली तर निर्दोष वास्तु आपल्याला सुख-समाधान देण्यात सफल होत असते. पण केवळ असे वरवर उपाय केले म्हणजे आपल्या समस्या सुटून लागलीच त्यातून फलप्राप्ती होईलच असं नाही. आपल्या घराची एकंदरीत बांधणी, आजूबाजूला असलेला परिसर, खिडक्या-दरवाजे कोणत्या दिशेला आहेत हे सर्व तपासून पाहावं लागतं. नेमका दोष कोठे आहे आणि त्याचा घरातील कुटुंबावर काय परिणाम होत आहे हेसुद्धा तपासावे लागते. घरात एखाद्या सदस्याला सतत वात, पित्त, डोकेदुखी असे काहीना काही त्रास होत असतील तर पूर्वकडील आणि दक्षिणेकडील रूममध्ये दोष असू शकतो. दक्षिण दिशेला टीव्ही असेल तर टीव्ही बघत जेवण करण्याची सवय असणार्‍यांना त्रास उद्भवू शकतात. घरात काही आनुवंशिक आजार असतील तर संतुलित वास्तूच्या सहाय्याने त्यांचीही तीव्रता कमी करता येते. आरोग्यासंबंधित असे अनेक संकेत, सूचना वास्तुशास्त्रात केले आहेत. आरोग्य आणि वास्तु यांचा थेट संबध आहे असं वास्तुशास्त्र सांगतं. आपली वास्तु शक्य तेवढी दोषमुक्त असावी जेणेकरून निरोगी आयुष्याचा उपभोग घेता येईल!

आरोग्य व आर्थिक सक्षमतेसाठी काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात अशा असतात. उदाहरणार्थ, घरात तुटके-फुटके आरसे असू नयेत, कोपर्‍यात भंगारवस्तु जमा केलेल्या असू नयेत, वास्तूशांतीचे नारळ, निर्माल्य हे जमा करून ठेवलेले असू नये, घरच्या मुख्य दरवाजाला उंबरा असणं आणि वेळोवेळी तो साफ करणं आवश्यक आहे. काय करू नये हे जसं महत्वाचं आहे तसं काय करावे जेणेकरून वास्तु संतुलित व लाभदायी राहील हेही महत्वाचं आहे. त्यामध्ये टिप्स बर्‍याच देता येतील. उदाहरणार्थ, घरात लक्ष्मीयंत्र असणे, कुबेरमंत्र उच्चारणे, घरात बांबू ट्री ठेवणे, उत्तर दिशेला असलेली खिडकी उघडी ठेवणे, आग्नेय कोपर्‍यात वास्तुपुरुषाची स्थापना अशा अनेक बाबी आहेत ज्यांचा अवलंब आपल्याला आर्थिक संपन्नता व आरोग्यदायी जीवन देऊ शकतं. पण या बाबी मनाने करण्यापेक्षा तुम्ही सुविद्य वास्तुशास्त्रतज्ञकडून जाणून घ्याव्यात आणि त्याची अमलबजावणी करावी. शेवटी आपल्या वास्तूत नेमका दोष कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी वास्तुचं परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच समस्येचं मूळ स्पष्टपणे समजू शकतं. दोषमुक्त वास्तु हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणता येईल.