वास्तु आणि विवाहयोग

प्रत्येक कुटुंबात सर्वाधिक आनंदाचा क्षण म्हणजे विवाह! विवाह हा कुटुंबातील आणि वास्तूमधील सर्वाधिक मंगल क्षण मानला जातो. आपल्याकडे लग्न हे केवळ दोन जीवांचं एकत्र येणं नसून दोन कूटुंब त्यामुळे एकत्र येत असतात. लग्नकार्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जात असतं. शिवाय,लग्न म्हणजे आपल्या घराण्याच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा योग असतो. पण आजच्या काळात “विवाह” ही एक मोठी समस्या बनला आहे. विवाह न जमणे आणि विवाहातून सुखप्राप्ती न होणे यामुळे लग्नसंस्थेवर विश्वास नसणार्‍यांची संख्या वाढत आहे. पण हे असं का घडत आहे याकडे कोणीही अभ्यासपूर्वक बघत नाही.

विवाहयोग नसणे ही आजच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. अनेक चांगल्या, संपन्न असलेल्या कुटुंबातील गुणी मुला-मुलींची लग्न लवकर जुळत नाहीत. सर्वकाही असून अपेक्षेसारखा जोडीदार न मिळणे यामुळे केवळ विवाहइच्छुक तरुण-तरुणीचं नाही तर त्यांचे कुटुंबियही काळजीत असतात. संपत्ती, रूप, चांगलं कूटुंब अशा सर्व जमेच्या बाजू असताना विवाह जुळत नाहीत याला वास्तूतील दोष कारणीभूत असतो. आपल्या घराची बांधणी आणि विवाहइच्छुक मुला-मुलींची राहणी या विवाह न जुळणे या अडचणीतले महत्वाचे मुद्दे आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिशेला एक तत्व आहे. जसं आग्नेय दिशेला अग्नि हे तत्व आहे. जर यातील काही तत्व असंतुलित झाले असतील तर त्या घरातील तरुण-तरुणींचे विवाह जुळणे कठीण होऊन बसते.

विवाहइच्छुक तरुण-तरुणी जर कोणत्या रंगाचे कपडे वापरतात,ते कोणत्या दिशेला झोपतात, त्यांची रूम कोणत्या दिशेला आहे, रूममध्ये कोणता रंग आहे अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबींचा अभ्यास करून वास्तुशास्त्रात विवाह न जुळणे या समस्येवर उपाय सुचवले आहेत. विवाहइच्छुक जोडप्यांनी शक्यतो उत्तर किंवा वायव्य दिशेच्या रूमचा वापर केला पाहिजे आणि झोपत असताना पूर्वेकडे डोकं करून झोपले पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. शिवाय, खोलीत गुलाबी अथवा निळ्या रंगाचा वापर केला तर तेही सकारात्मक बदल घडवण्यात हातभार लावू शकतं. असं केल्याने अपेक्षित स्थळ लवकर येऊ लागतात. जर विवाहइच्छुक तरुण-तरुणी बीम असलेल्या खोलीत किंवा आग्नेय दिशेला असलेल्या खोलीत जास्तकाळ वास्तव्य करत असतील तर ते टाळले पाहिजे.

प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि विवाह करताना प्रत्येकाच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. रंग-रूप-धन असा सर्व अभाव असणार्‍यांचीही लग्नं चटकन जुळतात आणि त्यांचा सुखाने संसार होऊ लागतो. पण कधी-कधी सर्वकाही असून स्वभावामुळेही लग्न जुळण्यास मोठा विलंब होताना दिसून येतो. त्यामुळे त्या तरुण-तरुणीच्या राहणीचा अभ्यास करून वास्तूत काही बदल केले तर त्याचा खूप मोठा फरक पडतो आणि लग्न जुळण्याची शक्यता वाढते. पण त्यापूर्वी संपूर्ण वास्तुचे परीक्षण करून त्यातील दोष जाणून घेणे हे आवश्यकच ठरते.

विवाह जुळणे हा एक भाग आहे आणि त्यापुढचा भाग आहे विवाह टिकणे. विवाह न टिकणे हा आजच्या काळातील जटिल प्रश्न बनला आहे. नवरा=बायकोमध्ये न पटणे किंवा कुटुंबियांमध्ये सतत वाद होऊन लग्न मोडणे ही जणू आजच्या काळातील फॅशन झाली आहे. आणि हे प्रमाण सुशिक्षित कुटुंबात वाढल्याने परिस्थिती जास्त गंभीर झाली आहे. केवळ आणि केवळ वास्तुदोषामुळे असे प्रकार घडत असतात हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. लग्नापूर्वी एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं अचानक एकमेकांना का नकोसं होतं याचा विचार झालाच पाहिजे. नवरा बायकोची झोपण्याची खोली, घरातील स्वयंपाकघर, बैठक ते अगदी शौचालय जर चुकीच्या ठिकाणी बांधलं गेलं असेल तर असे प्रकार घडत असतात.

आपण ज्या वास्तूत राहत असतो ती प्रत्यक्षपणे आपल्यावर प्रभाव पाडत असते. विविध दिशांनी येणार्‍या ऊर्जा व त्यातून निर्माण होणारी कंपने त्या वास्तूत राहणार्‍या माणसाच्या आरोग्य व मनावर परिणाम करत असतातच. त्यानुसारच माणूस प्रतिक्रिया देत असतो आणि वागत असतो ज्यातून स्वभावगुण ठरतो. हा स्वभावगुण किंवा त्यात असणारे दोष हेच तर नातेसंबंध निर्माण करतात आणि संपुष्टातही आणतात. त्या ववास्तूत सकारात्मक बदल करून दोष कमी होतील आणि गुणांची तीव्रता कशी वाढवता याबद्दल वास्तुशास्त्र तज्ञ मदत करू शकतात.

शेवटी ‘विवाहयोग’ म्हणजे तरी काय असतो! तर आपल्याला सुख मिळवून देणारा साथीदार लाभणे. तो शोधता आला पाहिजे आणि त्याच्यासोबतचं नातं टिकवता आलं पाहिजे. वास्तुशास्त्र यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतं हे लक्षात ठेवले पाहिजे.